आसाममध्ये जमावाकडून वाघाची हत्या   

दात, कान उपटून मिरवणूक काढली

गुवाहाटी : आसाममध्ये पाळीव प्राण्यांची हत्या करणार्‍या आणि त्यांच्यासाठी धोकादायक बनलेल्या एका वाघाची सुमारे एक हजार जणांच्या जमावाने हत्या केली. तसेच त्याचे दात, कान उपटून काढले आणि पाय तोडून त्वचा सोलली.. यानंतर वाघाचे अवयव हातात घेऊन चषक प्राप्त केल्याच्या अविर्भावात मिरवणूक काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
 
आसामच्या गोलीघाट जिल्ह्यात रॉयल बेंगॉल टायगर प्रकारातील एका वाघाची जमावाने नुकतीच हत्या केली होती. गेल्या आठवड्यांपासून तो परिसरातील नागरिकांना त्रास देत होता. त्यांच्या पाळीव जनावरांसाठी तो दिवसेंंदिवस धोकादायक बनत चालला होता. त्यामुळे नागरिक संतापले होते. बोलखाट उपविभागातील दुसूतीमुख परिसरातील भाताच्या शेतात वाघ लपला असताना जमावाने त्याला ग्रामस्थांनी चारही बाजूंनी घेरले. लाठी आणि धारदार हत्यारांनी वार करुन त्याची बुधवारी हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आणि वन विभागाने स्वतंत्र गुन्हा नोंदविला असून हत्या करणार्‍यांचा नागरिकांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, ग्रामस्थांंनी दावा केला की, पाळीव प्राण्यांसाठी वाघ धोकादायक बनला होता. त्याने बऱ्याच जनावरांची हत्या केली होती. त्यामुळे आम्ही आठवड्याभरापासून दहशतीच्या छायेत वावरत होतो. वन विभागाने वाघाला जेरबंद करण्यासाठी किंवा ठार मारण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे आम्हीच त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला. वन विभागाने तातडीने पावले टाकली असती तर त्याचा मृत्यू झाला नसता. 
 
खुमताईच्या आमदार मृणाल सैकिया यांनी वाघाच्या हत्येचा निषेध केला आहे. अत्यंत दुर्दैवी आणि माफ करण्यायोग्य घटना नसल्याचे सांगितले. वन जीवांसंदर्भात आणीबाणीच्या काळात सरकारने वेळीच आणि ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान, घटनास्थळावरून वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी न्याय दंडाधिकार्‍यांच्या उपस्थितीत वाघाच्या मृतदेहाचे अवशेष गोळा केले. तसेच गुन्हा दाखल करुन घेतला आहे. वाघाची हत्या करणार्‍या जमावातील व्यक्तींची ओळख पटविण्याचे तसेच त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. 
 

Related Articles